सर्व मराठी मनास आणि जनास ६३ व्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या मंगलमय सदिच्छा.
🙏🙏🙏
महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणून कधी उदयास आला ? त्यास महाराष्ट्र हे नामाभिधान केव्हा प्राप्त झाले, सांगता येईल काय ? तर चला आज महाराष्ट्र दिनी त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे भाषावार राज्यांची विभागणी होऊन मराठी भाषिकांसाठी केवळ एकमात्र राज्य दिनांक १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. त्यासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या चळवळीत सुमारे १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या सर्व ज्ञात अज्ञात हौतात्म्याना विनम्र अभिवादन करून आज संपूर्ण महाराष्ट्र मधील मराठी जन आणि मन ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करत आहे. आता जसा एकसंध महाराष्ट्र आपणास दिसतो, तसे राजकिय दृष्ट्या एकसंध महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात न्हवते. हे महाराष्ट्र आताच्यासारखे एकसंध न्हवते मग ते कसे होते. येथील प्रदेशाला कोणते नाव होते? प्राचीन काळात आताच्या महाराष्ट्राचे स्वरूप कसे होते. यांसंबंधीचे प्राचीन उल्लेख कुठे- कुठे आलेले आहेत. सदर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून आपण करणार आहोत.
पाली वाङ्मयांत अपरांत, विदीशा, कोसल, अस्सक, अलक, दक्षिणापथ, आंध्र, महारठ्ठ इ. देशांचा उल्लेख मिळतो. यांपैकी, अपरांत म्हणजे उत्तर कोकण होय. सुत्तनिपात्ताच्या पारायण वग्गात असे म्हटले आहे की, कोसल देशाचा बावरी ब्राह्मण दक्षिणापथात गेला व तेथे अस्सक राज्यात अलक राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागला. यावरून, असे निष्कर्ष काढता येते गोदावरी नदीच्या आसपासच्या प्रदेशास दक्षिणापथ असे म्हणत.
मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. परंतु; त्यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या लिखित इतिहासाची माहिती मिळत नाही. मौर्य साम्राज्य संस्थापक चंद्रगुप्त मौर्य (शासनकाळ इ.स. पूर्व ३२४ ते इ.स. पूर्व ३००) यांच्या कालखंडात त्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता की न्हवता असल्यास तो महाराष्ट्राच्या कोणत्या भागावर होते याचे निश्चित असे पुरावे अजून तरी मिळत नाहीत. परंतू; महाराष्ट्राचाच न्हवे तर संपूर्ण भारताच्या लिखित इतिहासाची सुरुवातच ज्यांच्या शिलाशासनांपासून होते ते चक्रवर्ती सम्राट अशोक (शासनकाळ इ.स. पूर्व २७४ ते इ.स. पूर्व २३२) यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होत होता याचे निश्चित असे पुरावे सापडतात.सम्राट अशोकांच्या शिलालेखात आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी व धम्माचे योग्य पालन करण्यासाठी त्यासाठी मार्गदर्शनार्थ त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशांत धम्ममहामात्रांची नियुक्ती केली होती, असे उल्लेख आढळतात. त्यात रस्तिक, पेटनिक व अपरांत देशाचा उल्लेख आहे. डॉ. भांडरकरांच्या मते, रस्तिक म्हणजे रठी-महारठी लोक राहात असलेला प्रदेश, पेटनिक म्हणजे आताचे पैठण (प्रतिष्ठान) तसेच अपरांत म्हणजे उत्तर कोकण होय. सिलोन (श्रीलंका) मध्ये लिहिलेल्या पाली भाषेतील दिपवंस व महावंस या बौद्ध साहित्यात 'महारठ्ठ' देशाचा उल्लेख आहे. तो असा की, " महाधम्मरक्खित यांस महारठ्ठ देशात तसेच योन (यवन) धम्मरक्खित यास अपरांत देशास धम्ममहामात्र म्हणून पाठवले. यांपैकी; महारठ्ठ म्हणजे महाराष्ट्र देश की सयामजवळचा प्रदेश याविषयी अभासकांमध्ये मतभेद आहेत. परंतू; महाराष्ट्रातील बहुतेक विद्वानांनी महारठ्ठ म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय असे मत व्यक्त केले आहे. तसेच, यापुढे जाऊन पालीभाषेतील महारठ्ठ याचे संस्कृत पंडितांनी महाराष्ट्र असे रूपांतर केले आहे. सम्राट अशोकांच्या आठव्या व नवव्या राजाज्ञा ह्या मुंबई पासून जवळच असलेल्या पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या व सध्या पालघर जिल्ह्यात मोडणाऱ्या सोपारा (आजचे नालासोपारा) येथे सापडल्या.सोपारा ही मौर्यांची प्रांतिक राजधानी होती, हे इथे सापडलेल्या सम्राट अशोक यांच्या राजाज्ञांवरून स्पष्ट होते.
मौर्यांच्या नंतर महाराष्ट्र सातवाहनांच्या वर्चस्वाखाली आला. सातवाहन स्वतःला दक्षिणापथपती म्हणवून घेत असत. इ.स. पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अगोदर असलेली रठी, महारठी यांची राज्ये सातवाहनांचे राज्य आल्यावर संपुष्टात आली असावीत. आंध्रच्या सातवाहनांनी आपल्या साम्राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करताना त्यांना येथील रठी - महारठींनी मोठा विरोध केला असावा. म्हणूनच त्यांना 'अरि' म्हणजे शत्रू असे नाव पडले व त्यांच्या प्रदेशाला अरियके असे नाव पडले असावे. यासंदर्भात टॉलेमीने त्याच्या Geography ह्या ग्रंथात महाराष्ट्राला अरियके असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील लेण्यांत मोठ्या प्रमाणावर रठी - महारठी यांचे लेण्यांना दान दिलेले दानशिलालेख मोठ्या प्रमाणावर पाहता - अभ्यासता येतात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथील लेणीतील शिलालेखात महारठी त्रनकयीर व त्याची मुलगी व सातकर्णी राजाची पत्नी राणी नागनिक यांचे पुतळे व नागनिकेचा भलामोठा शिलालेख पाहता येतो. यावरून असे अनुमान काढता येते की, नागनिकेचा पिता महारठी त्रनकयीर व त्याची मुलगी नागनिका म्हणजेच तत्कालीन रठी - महारठी आपल्या नावापुढे 'नाक' हे संबोधन लावत. त्यावरून हे रठी - महारठी नाग जमातीचे असावेत. महाराष्ट्रातील असंख्य बौद्ध लेण्यांत शिलालेखांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाक उपपद असलेले दानकर्त्यांची यादी दिली तर लेख अजुनही बराच मोठा होईल. उत्तरेत मौर्यांच्या नंतर राजकीय अस्थिरता आली असली तरीही दक्षिणेत सातवाहनांचा एकछत्री अंमल असल्याकारणाने देशातील निरनिराळ्या जमाती एकत्र येण्यास व त्यांचे सामाजिक अभिसरण होण्यास मौर्याप्रमाणेच सातवाहनांचा काळ अनुकूल होता. सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभल्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्यापार, कलाकौशल्य यांच्यात भरभराट झाली. याचा पुरावा म्हणजे Periplus of the Erythrean Sea ह्या ग्रीक ग्रंथात महाराष्ट्रातील पैठण व तेर (तगर) ह्या शहरांचा उल्लेख मोठ्या व्यापारी शहरांच्या उद्देशाने आला आहे. ह्या काळात इजिप्त, ग्रीस, रोम यांसारख्या पाश्चात्य देशांशी महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. महाराष्ट्रात पैठण, कोल्हापूर उस्मानाबाद जवळील तेर (तगर) येथे रोम ची सुवर्ण नाणी व काही ब्राँझ धातूच्या वस्तू सापडल्या आहेत.सातवाहनांच्यानंतर महाराष्ट्रावर अथवा महाराष्ट्राच्या काही भागांवर क्षहरत, अभिर, त्रेकुटक, वाकटकांनी राज्य केले.
नाणेघाटातील ऐहिक लेणीतील सातवाहन कुळाचे शिल्पपटाचे रेखाचित्र ( इंटरनेटवरून साभार )
उत्तरेत जरी मौर्यांचे साम्राज्य संपुष्टात आले असले तरीही महाराष्ट्रात त्यांची छोटी छोटी राज्ये बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात होती. चालुक्यांच्या दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्यांचा इ.स. ६२५ मध्ये प्रभाव केला असा उल्लेख ताम्रपटात आढळतो. तसेच खान्देशातील वाघली येथे सापडलेल्या शिलालेखावरून मौर्यांचे एक छोटे राज्य खान्देशात होते. त्या शिलालेखात असे म्हंटले आहे की मौर्य काठेवाडातून खान्देशात आले. हा शिलालेख शके ९९१ म्हणजेच इ.स. १०६९ सालचा आहे. कोरीव लेखातील महाराष्ट्राचा पहिला उल्लेख चालुक्यवंशी दुसरा पुलकेशीच्या काळात इ.स. ६३४ मध्ये ऐहोळे शिलालेखात आढळतो असे मानतात. ऐहोळ येथील लेखात महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याणव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख येतो. परंतू; एरण येथील स्तंभलेखात तो प्रथमतः आला आहे. असा संदर्भ डॉ. वा. वि. मिराशी यांच्या सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख यात सापडतो. क्षत्रप राजा श्रीधरवर्मा याचा रक्षक सत्यनाग याने एरण येथे झालेल्या घनघोर युद्धात धारातीर्थी पडलेल्या नागसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्तंभ उभारल्याचा उल्लेख आहे. त्या लेखात सत्यनागाला 'महाराष्ट्रक' म्हटलेले दिसते. त्या लेखामध्ये काळाचा उल्लेख नाही. परंतु; श्रीधरवर्माच्याच दुसऱ्या लेखात शक संवत १०२ (इ.स.१८०) चा उल्लेख दिसतो. त्यावरून महाराष्ट्र हे देशनाम निदान इ.स. दुसरे शतक इतके प्राचीन असावे असे अनुमान काढण्यास काही हरकत नाही, असे मिराशी दर्शवतात. ह्यू एन त्संग आपल्या भारतयात्रेदरम्यान इ.स. ६४१ - ४२ मध्ये महाराष्ट्र देशात आला होता. त्याने आपल्या प्रवासवर्णनात मो - हो - लो - च्छि या देशाचे वर्णन केले आहे. विद्वानांच्या मते तो देश म्हणजेच महाराष्ट्र होय.
महाराष्ट्रात शिलाहारांच्या तीन शाखा आढळून येतात. एक शाखा अपरांत प्रांतात म्हणजेच उत्तर कोकणात होती. त्या शाखेची राजधानी पुरी म्हणजेच हल्लीची घारापुरी. दुसरी शाखा कोकणात व तिसरी शाखा कऱ्हाड - मिरज भागात होती. ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटियर मध्ये पुरी म्हणजे घारापुरी असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यास अनेक विद्वान दुजोरा देतात. येथे पोर्तुगीज आले तेव्हा त्यांना खडकात कोरलेला एक मोठा हत्ती आढळला. म्हणून घारापुरीला पोर्तुगीजांनी 'एलिफंटा' हे नाव दिले. हा हत्ती सध्याच्या घडीला मुंबई येथील भायकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय च्या आत प्रवेशद्वारपाशी ठेवलेला दिसून येतो. शिलहारांच्या तीनही शाखा आपल्या नावापुढे 'तगरपूरवराधिश्वर' म्हणजेच सर्व शहरात श्रेष्ठ अशा तगर (तेर) शहराचे अधिपती अशी बिरुदावली लावत.
काही अभ्यासकांनी राष्ट्रकुटांवरून महाराष्ट्राचे 'महाराष्ट्र' असे नाव पडले असे देखील म्हटले आहे. पण ते बरोबर नाही कारण वरील अनेक पुराव्यानुसार राष्ट्रकुटांच्या खूप अगोदर महाराष्ट्राचे महाराष्ट्र हे नाव होते असे सिद्ध होते. राष्ट्रकुटांच्या दंतीदुर्गनंतर त्याचा चुलता कृष्णराजा इ.स. ७५३ ते ७७५ याकाळात गादीवर बसला. वेरूळ येथील अप्रतिम कैलास लेणे हे कृष्णराजाने खोदवून घेतले आहे. त्यानंतर दुसरा गोविंद, ध्रुवनिरूपण, तिसरा गोविंद, पहिला अमोघवर्षं इ. राजे झाले. राष्ट्रकुटांनी महाराष्ट्रावर इ.स. ७४८ ते इ.स. ९७२ पर्यंत राज्य केले. राष्ट्रकुटांच्यानंतर चालुक्यांचे राज्य काही काळ महाराष्ट्रावर आले. या चालुक्यांच्या पहिल्या चालुक्यांशी काही संबंध होता की नाही याबाबतीत बऱ्याच विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. चालुक्यांच्य तैलपाने राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा कक्कल यांचा इ.स.९७२ मध्ये पराभव करून राष्ट्रकूटांचे साम्राज्य संपुष्ट आणले. तैलपाने चोल, चेदी, लाट, माळवा, येथील राजांचा पराभव केला परायात झालेल्या अनेक राजांपैकी दुसरा विक्रमादित्य ह्याचा विशेष उल्लेख लागेल. त्याने जवळ जवळ ५० वर्षे राज्य केले. चालुक्यांचा राजा दुसरा तैलप ह्याचे राज्य त्याचा सेनापती बिज्जल ह्याने बळकावले कलचुरीच्या कुळातील होता. चालुक्यांची ताकद कमी झाली असता हळेबीडच्या होयसाळ राजांनी महाराष्ट्राचा बराच प्रदेश काबीज केला होता. पुढे बिजलाच्या वेळेस राज्य अगदी खिळखिळीस आले होते. त्याचा फायदा घेऊन उत्तरेकडील यादवांनी महाराष्ट्रावर चाल केली. मल्लगीचा मुलगा भिल्लम याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीवर्धन, अंतल नावाच्या राजापासून जिंकून घेतले. नंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा बराच प्रदेश जिंकून देवगिरी येथे आपले राज्य इ.स. ११८७ मध्ये स्थापन केले . भिल्लमाने नंतर आपल्या राज्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. यादव कुळातील राजे महादेव व रामदेव यांचा सचिव हेमाद्री हा होता. हेमाडपंत ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. हेमाडपंथी बांधणीची देऊळ महाराष्ट्रात अजूनही ठिकठिकाणी आढळतात. इ.स. १२९४ साली अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाचा पराभव करून देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला. पुढे दिल्लीच्या अंतस्थ राजकारणामुळे खिलजी घराण्याचे राज्य मोडकळीस आले. त्याचा फायदा घेऊन रामदेवरायाचा जावई हरपाल याने दक्षिणेत उठाव केला. त्याला शिक्षा करण्यासाठी अल्लाउद्दीन खिळजीचा मुलगा मुबारक स्वतः देवगिरीला आला. त्याने हरपाल ला कैद करून जिवंतपणे त्याची कातडी सोलून त्यास इ. स. १३१८ मध्ये ठार मारले आणि तेव्हापासून इस्लामी आक्रमकांचे राज्य महाराष्ट्रावर सुरू झाले.
संदर्भ :-
* महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास - मा.शं. मोरे
* सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख - डॉ. वा. वि. मिराशी
* बॉम्बे गॅझेटियर ठाणे डिस्ट्रिक्ट
* पियदसि राञा हेवं आहा .... - अशोक तपासे
नमो बुद्धाय जयभीम जय सम्राट अशोक
ReplyDeleteनमो बुद्धाय जय भीम 🙏
Deleteमहाराष्ट्र निर्मीतीचा पाले मुळ्या सहित इतिहास आणि मत मतांरेचा केलेला उहा पोह प्रस्तुत लेख लिहिण्या मागचा उद्देश पुर्ण करतो.महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची जन्मकुंडली सांगुन ओळख करून दिली, त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 😊🙏
Deleteखूप छान आणि माहितीपूर्ण लिखाण.... सखोल माहिती दिल्याबद्दल,आपले खूप खूप आभार सर
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Delete