मुख्य सामग्रीवर वगळा

किल्ले गुमतारा - एकांतवासात दिवस कंठत असलेला अल्पपरिचित दुर्ग

काही ठिकाणांनी आपल्या भौगोलिक स्थानामुळे इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली असतात. पण पुढील काळात वाढत्या आधुनिकीकरण तसेच शहरीकरणामुळे हा इतिहास मागे पडत चालला असताना; ती ठिकाणे मात्र एकांतवासात हरवतात. शोधलीत तर अशी खुप ठिकाणे आपल्या अवतिभोवती दिसून येतील. अशाच अनेक ठिकाणांपैकी एक भिवंडीजवळील किल्ले गुमतारा होय. हरेंद्र मास्तर यांनी सदर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आदल्या दिवशी विचारणा केली आणि खुप दिवस किल्ले भटकंती केली नसल्याने लागलीच होकार दिला.

गुमतारा किल्ला हा कल्याण येथून ३१ किमी अंतरावर असून, कल्याण येथून भिवंडी - वाडा रोडवर वज्रेश्वरीच्या अलीकडे १० किमी अंतरावर दुगाड फाटा येथून आत दुगाड, मोहीली तसेच घोटेगाव गावाच्या हद्दीत उभा आहे. या किल्ल्याला घोटवड किल्ला, दुगाड किल्ला, गोतारा अशी आणखी काही नावे आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगलात उंच टेकडीवर असलेला हा किल्ला चढण्यास मध्यम श्रेणीचा असला तरीही या किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक पायवाटा - ढोरवाटा हा मार्ग जिकरीचा करतात. जंगलटप्पा पार करून वरील भाग काहीसा निसरडा मुरुमाचा आहे. तेव्हा हा भाग करताना जरा जपून अन्यथा तुमची एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. इथून पुढे डोंगरधारेवरून सरळ निमुळत्या वाटेने वर जात एके ठिकाणी गडाची तटबंदी असलेली दिसून येते. या ठिकाणी तटबंदीचे काही दगड ढासळलेले दिसून येतात. याच मार्गे वर जात आपण गडाच्या मुख्य महादरवाजापाशी येऊन उभे ठाकतो आणि आतापर्यंत केलेल्या कष्टाचे (तंगडतोडीचे) चीज झाल्यासारखं वाटते. महादरवाजा हा गोमुखी बांधणीचा असून दगडी तटबंदीने युक्त असा आहे. महादरवाजाच्या पायथ्याशी मूळ दगडातील पायऱ्या आणि त्यास काहीठिकाणी असलेली एकसंध कातळ भिंत ही सातवाहनकालीन दुर्गरचनेची साक्ष पटवून देते तर नंतर शिवकाळात त्यास दगडी चिऱ्यांची तटबंदी बांधून सदर महादरवाजा भक्कम केलेला दिसतो. महादरवाजा ओलांडून वर आल्यावर समोरच पाण्याचे भग्न टाके दिसून येते. तसेच महाद्वाराच्या बाजूने जाणाऱ्या उजव्या वाटेने समोरील दिशेस पाच पिण्याच्या पाण्याच्या सातवाहनकालीन टाक्या आहेत. महाद्वार तसेच या पाण्याच्या टाक्या येथून मधून जाणाऱ्या वाटेने वर गेल्यावर वाड्यांचे दगडी चौथरे दृष्टीस पडतात. यातील एका ठिकाणी नव्याने बसवलेली गडदेवता असून तिच्या हातात त्रिशूळ व तलवार आहे. तिजशेजारी सतीशिळेचा एक भग्न भाग ठेवलेला आहे. या गडदेवतेच्या स्थानावरून थोडे वरील बाजूस गेल्यावर एक कोरडे पाण्याचे टाके दिसून येते. तसेच येथून वरील वाट ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते.

तर प्राचीनकाळी सोपारा - कल्याण मार्गावर देखरेखीसाठी ह्या किल्ल्याची निर्मिती चौकिवजा केली असावी. मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार असा हा किल्ला आपली शेवटची घटका मोजत उभा आहे.

टीप:- स्वतःजवळ प्रत्येकी किमान २ लिटर पिण्याचे पाणी बाळगावे.

#सह्याद्री #gumtarafort #trek #trekkingindia #trekking #rohitrbhosale

छायाचित्र :-

१. किल्ले गुमतारा

२.सोबती
३.दिशादर्शक फलक 

४. गडाचा महादरवाजा

५.महादरवाजा (मुख्य प्रवेशद्वार)

६. गोमुखी बांधणीची मुख्य प्रवेशद्वार रचना

७. महादरवाजा तसेच बुरुज व तटबंदी

८. दुर्ग अवशेष नकाशा फलक

९. कातळकोरीव पाण्याचे टाके
१०. गडदेवतेचे ठाणे
११. गडदेवता


किल्ले गुमतारा सफरीचा व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube लिंक :- https://youtu.be/xzpr78D0iOU?si=NMkHcwY1qFN2z4Vc


धन्यवाद 🙏🙏🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...