मुख्य सामग्रीवर वगळा

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे.

या सफरीसाठी मी रोहित रा. भोसलेप्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, रविवारी तरच येथे पायथ्याला काही खाण्याची स्टॉल दिसतील. अन्यथा इतर दिवशी व पावसाळा वगळता येथे भेट देण्याचे ठरवत असाल तर पायथ्याला खाण्याची कोणतेही दुकाने दिसणे दुरापास्त असेल. तेव्हा आपला खाऊ तसेच मुबलक पाणी घरून किंवा खोपोली स्थानकावरून येतानाच घेऊन येणे. ऑटो रिक्षा वाले हे ठाकूरवाडी कडे बहुदा सोडतात. ठाकूरवाडी कडे उतरले असता, ठाकूरवाडी ते संतोषी माता मंदिर हे अंतर पायी चालत पार करावे लागते. संतोषी माता मंदिर येथे आले असता येथून झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी वाट वाकडी करावी लागते अर्थात धबधब्याला जाणारा फाटा फुटतो. आम्ही मात्र संतोषी माता मंदिर येथे जाणारी वाट वाकडी न करता सरळ (झेनिथ धबधबा येथे जाणारा फाटा वगळून) त्यापुढील दत्त मंदिर कडे जाणारी वाट धरली. दत्त मंदिर कडे काही रिक्षा वाले थेट आणून देखील सोडतील, तसे आधीच त्यांच्याशी ठरवून घ्यावे. दत्त मंदिराकडून आता आपला ' के पी धबधबा ' चा ट्रेल खऱ्या अर्थाने चालू होतो. मुख्य वाट ही सरळ व रुळलेली असल्याने चुकण्याचा धोका तसा काहीच नाही. वाटेत येथे वरून येणाऱ्या धबधब्याचा पाण्याचा प्रवाह ओढ्याच्या स्वरूपात वाहत असतो. खुप पावसाच्या वेळेत ते प्रचंड प्रमाणात ओसंडून वाहत असावेत. आम्ही गेलो असता तेव्हा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्या ओढ्यांचा प्रवाह मर्यादित होता. येथे काही अंतर कापून गेल्यानंतर एक कातळटप्पा लागतो. तो काहीसा खड्या चढाईचा आहे. यावर प्राचीन काळच्या मानवनिर्मित कातळकोरीव दगडी पायऱ्या मोठ्या संख्येने दिसतात. दगडी पायऱ्यांची स्थिती येथे पहा.

बोरघाट हा प्राचीन काळात मुंबई व पुणे भूभागाला जोडणारा एक महत्त्वाचा घाटमार्ग राहिला आहे. ज्यावेळेस दळणवळणाची आधुनिक साधने न्हवती. त्यावेळेस; या घाटवाटेवरून माणूस पायी चालत अथवा प्राण्यांच्या सहाय्याने हे अंतर पार करून जात असत. या ठिकाणी कातळकोरीव पायऱ्यांची मोठ्या संख्येने आढळून येणारी रचना हे सिद्ध करते की; प्राचीन काळी येथून बोरघाटाची एक वाट येथून जात होती. या दगडी पायऱ्या पावसाळ्यात शेवाळ साचल्याने गुळगुळीत होऊन निसरड्या होतात. तेव्हा येथे येताना चांगल्या प्रतीचे आणि ज्याची पकड मजबूत असेल ट्रेकिंग बूट घाला, असे यानिमित्ताने सुचवेन. या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर केवळ पाऊण तासात आपण मळलेल्या वाटेवरून या रेल्वे ब्रीज जवळ येऊन पोहोचतो. येथे डोंगरउतारावरून पावसाळ्यात धबधबा कोसळतो. पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा धबधबा आणि पुलावरून जाणारी पुणे - मुंबई मार्गावरील रेल्वे हा नजारा पाहण्यालायक व अवर्णनीय असाच आहे. KP WATERFALL ची YouTube चित्रफित जरूर पाहा.

काही क्षणचित्रे...

धन्यवाद 🙏 

✍️ रोहित रा. भोसले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...