दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे.
या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, रविवारी तरच येथे पायथ्याला काही खाण्याची स्टॉल दिसतील. अन्यथा इतर दिवशी व पावसाळा वगळता येथे भेट देण्याचे ठरवत असाल तर पायथ्याला खाण्याची कोणतेही दुकाने दिसणे दुरापास्त असेल. तेव्हा आपला खाऊ तसेच मुबलक पाणी घरून किंवा खोपोली स्थानकावरून येतानाच घेऊन येणे. ऑटो रिक्षा वाले हे ठाकूरवाडी कडे बहुदा सोडतात. ठाकूरवाडी कडे उतरले असता, ठाकूरवाडी ते संतोषी माता मंदिर हे अंतर पायी चालत पार करावे लागते. संतोषी माता मंदिर येथे आले असता येथून झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी वाट वाकडी करावी लागते अर्थात धबधब्याला जाणारा फाटा फुटतो. आम्ही मात्र संतोषी माता मंदिर येथे जाणारी वाट वाकडी न करता सरळ (झेनिथ धबधबा येथे जाणारा फाटा वगळून) त्यापुढील दत्त मंदिर कडे जाणारी वाट धरली. दत्त मंदिर कडे काही रिक्षा वाले थेट आणून देखील सोडतील, तसे आधीच त्यांच्याशी ठरवून घ्यावे. दत्त मंदिराकडून आता आपला ' के पी धबधबा ' चा ट्रेल खऱ्या अर्थाने चालू होतो. मुख्य वाट ही सरळ व रुळलेली असल्याने चुकण्याचा धोका तसा काहीच नाही. वाटेत येथे वरून येणाऱ्या धबधब्याचा पाण्याचा प्रवाह ओढ्याच्या स्वरूपात वाहत असतो. खुप पावसाच्या वेळेत ते प्रचंड प्रमाणात ओसंडून वाहत असावेत. आम्ही गेलो असता तेव्हा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्या ओढ्यांचा प्रवाह मर्यादित होता. येथे काही अंतर कापून गेल्यानंतर एक कातळटप्पा लागतो. तो काहीसा खड्या चढाईचा आहे. यावर प्राचीन काळच्या मानवनिर्मित कातळकोरीव दगडी पायऱ्या मोठ्या संख्येने दिसतात. दगडी पायऱ्यांची स्थिती येथे पहा.
बोरघाट हा प्राचीन काळात मुंबई व पुणे भूभागाला जोडणारा एक महत्त्वाचा घाटमार्ग राहिला आहे. ज्यावेळेस दळणवळणाची आधुनिक साधने न्हवती. त्यावेळेस; या घाटवाटेवरून माणूस पायी चालत अथवा प्राण्यांच्या सहाय्याने हे अंतर पार करून जात असत. या ठिकाणी कातळकोरीव पायऱ्यांची मोठ्या संख्येने आढळून येणारी रचना हे सिद्ध करते की; प्राचीन काळी येथून बोरघाटाची एक वाट येथून जात होती. या दगडी पायऱ्या पावसाळ्यात शेवाळ साचल्याने गुळगुळीत होऊन निसरड्या होतात. तेव्हा येथे येताना चांगल्या प्रतीचे आणि ज्याची पकड मजबूत असेल ट्रेकिंग बूट घाला, असे यानिमित्ताने सुचवेन. या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर केवळ पाऊण तासात आपण मळलेल्या वाटेवरून या रेल्वे ब्रीज जवळ येऊन पोहोचतो. येथे डोंगरउतारावरून पावसाळ्यात धबधबा कोसळतो. पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा धबधबा आणि पुलावरून जाणारी पुणे - मुंबई मार्गावरील रेल्वे हा नजारा पाहण्यालायक व अवर्णनीय असाच आहे. KP WATERFALL ची YouTube चित्रफित जरूर पाहा.
काही क्षणचित्रे...
धन्यवाद 🙏
✍️ रोहित रा. भोसले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा