मुख्य सामग्रीवर वगळा

एकदशमुख अवलोकितेश्र्वर धारणी सूत्रावर आधारित एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्व

एकदशमुख अवलोकितेश्र्वर धारणी सूत्र हा बौद्ध धम्मातील एक महत्त्वाचा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. या संस्कृत सुत्ताचे भाषांतर प्रथमतः संस्कृत मधून चायनीज भाषेत झाले असून ते इसवी सनाच्या ६५६ मध्ये जगद्विख्यात चायनीज भिक्खू ह्यु - एन - त्सांग (XUAN XANG) यांनी केले आहे. या संस्कृत सूत्रावर आधारित अकरा डोकी व अनेक हात असलेली एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्वाचे शिल्प तयार करण्यात आलेले आहे. महायान व वज्रयान काळातील मान्यतेनुसार अकरा डोकी व अनेक हात असलेली अवलोकितेश्र्वर बोधिसत्व देवता प्रसिद्धी पावली होती. अनेक डोकी असण्यामागे अशी धारणा होती की, आपले भक्त, अनुयायांसाठी तथा भूतलावरील प्रत्येक प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी हरतऱ्हेने बोधिसत्व अवलोकितेश्र्वर लक्ष ठेऊन आहेत. तसेच अनेक हात मागील धारणा अशी की; जगाच्या कल्याणासाठी तसेच दुःख दूर करण्यासाठी सर्वप्रकारे सक्षम आहेत. हे बोधिसत्व बुद्धत्वप्राप्तीच्या मार्गावर असून समस्त भूतलावरील प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अनिश्चित काळासाठी ते बुद्धत्व प्राप्ती लांबणीवर टाकतात, अशी संकल्पना महायान, वज्रयान कालखंडात पराकोटीवर होती. वरील उल्लेख केलेल्या सूत्रावर आधारित जगातील पहिली तथा लेण्यातील  कदाचित एकमेव मुर्ती आजच्या मुंबई उपनगरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी बौद्ध लेणीसमूहात पाहता येते. याच सूत्रावर आधारित कान्हेरी लेणी क्रमांक ४१ मधील एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्व चित्र क्रमांक २ मध्ये पाहू शकता. तर चित्र क्रमांक १ तसेच ३ मध्ये दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथील प्रदर्शनार्थ ठेवलेले एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्वाचे धातूच्या मूर्तीमधील शिल्प पाहू शकता.

कान्हेरी लेणी समूहातील लेणी क्रमांक ४१ मधील एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्व (चित्र क्रमांक २)

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथील धातुस्वरुपातील एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्व (चित्र क्रमांक ३)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...