मुख्य सामग्रीवर वगळा

पवनीच्या महास्तूपाचे अवशेष मुंबईकरांच्या भेटीला...

पवनी (अक्षांश २०° ४६' ४८" उत्तर, रेखांश ७९° ३७' ४८") हे शहर आजच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असून नागपूरपासून ८२ किमी अंतरावर आग्नेयेस तर वैनगंगा नदीपासून ३ किमी अंतरावर नैऋत्य दिशेस स्थित आहे. पवनी हे प्राचीन काळापासून इथल्या तलम रेशीम कापडासाठी प्रसिद्ध असलेले शहर १९६८ मध्ये  अचानक एका वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले त्याला कारण म्हणजे एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमी ठरली. त्या बातमीचा मथळा असा की; जगन्नाथ टेकडीजवळ काही शिल्पे व ब्राम्ही लिपी उत्किर्ण असलेले स्तंभसदृष दगड सापडले आहेत. त्यानंतर; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ व नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे भेट देण्यात आली व त्यांना इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध शिल्पे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याअगोदर हेन्री कझिंस यांनी प्राचीन पुरावशेषांची यादी १८९७ मध्येच पवनी हे महत्त्वाचे प्राचीन पुरावशेष शहर म्हणून सांगितलेले होते. १९६८ च्या भेटीनंतर येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करणे आवश्यक आहे यावर विचार सुरू झाला.

जागेचा विस्तार व तेथे उपलब्ध शिल्पकला यांचा विस्तार पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ,नागपूर यांचे उत्खनन विभाग व नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाचे तत्कालीन प्रमुख श्री. शं. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन सुरू करण्यात आले. फेब्रुवारी १९६९ ते एप्रिल १९७० अशा कालावधीत दोन सत्रांत घडवून आणल्या गेलेल्या अनुक्रमे  जगन्नाथ टेकडी, चंडकापुरा टेकडी व हर्डोलाला टेकडी उत्खननाने करण्यात आले. पुरातत्त्वीय अवशेष आजूबाजूच्या ५ चौरस किमी एवढ्या मोठ्या प्रदेशात विखुरली गेली होती. उत्खननामध्ये स्तूपाच्या स्थापत्याचा कालावधी नुसार टप्पे समोर येत गेले ते पुढीलप्रमाणे :-

टप्पा १ :- (vii) यामध्ये मर्यादित प्रमाणात दुरुस्ती व नूतनीकरण झालेला स्तूपाचा भाग समाविष्ट आहे. जो की या स्तुपाचा सर्वात बाहेरचा भाग आहे. तद्नंतर

टप्पा २ :- (vi) यामध्ये दगडी स्लॅबसह प्रदक्षिणा पथ, बाह्य रेलिंग (वेदिकापट्टी) , प्रवेशद्वार आणि खांब असून

(v) दगडी स्तंभ रेलिंग (वेदिकापट्टी) आतील बाजूची,

(iv) लाकडी वेदिकापट्टी सह आजच्या इंजिनियर यांच्या भाषेत पाच कोर्स विटांचे वर्तुळाकार अवशेष

(iii) चुन्याचा प्रदक्षिणा पथ लाकडी वेदिकापट्टी सह

(ii) स्तूपाचे पहिले आवरण

(I) मूळ स्तूप.

तिथे मोठ्या प्रमाणावर उत्खननातून प्राचीन स्तूपाचे पुरावशेष प्राप्त झाले असून यामध्ये; स्तुपाचे वेगवेगळ्या संरचनात्मक टप्प्यांबरोबरच शिल्पे, शिलालेख, नाणी तसेच मातीची भांडी सापडली आहेत. या उत्खननाद्वारे असे सिद्ध झाले की; पवनीमध्ये एकेकाळी भारतातील सर्वात मोठा स्तूप अस्तित्वात होता. जो आजच्या जगप्रसिद्ध सांची स्तूपापेक्षा कैकपटीने मोठा होता. इथे मोठ्या प्रमाणावर थेरवादी बौद्ध वसाहत  होती. जगन्नाथ टेकडी येथील उत्खननात मिळालेल्या स्तूपाच्या उपलब्ध अवशेषांच्या अभ्यासावरुन  स्तूपाचे स्तर अथवा बांधकाम अथवा विस्तारीकरण तीन वेगवेगळ्या कालखंडातील असून ते  खालीलप्रमाणे सांगता येतात.

(i) मौर्यकालिन,
(ii) शुंग (सुंग) कालीन,
व (iii) सातवाहन व क्षत्रप

पवनीचा महास्तूप आता केवळ भारताच्या विविध संग्रहालयात अवशेष रूपाने जिवंत असून तो त्याच्या मूळ ठिकाणाहून नष्ट झालेला आहे. सदर चित्रात माझ्या शेजारी दिसत असलेले हे स्तंभशिल्प याच पवनीच्या महास्तूपाच्या वेदिकापट्टीचे वर्तुळाकार रेलिंग स्तंभ आहे. लाल वालुकाश्म खडकाचे हे स्तंभ ई.स. पूर्व पहिल्या शतकातील असून ते सातवाहन कालखंडात या स्तूपाला दान दिल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे. या उपलब्ध स्तंभावर खालील बाजूस असलेल्या स्त्री पुरुष शिल्पे ही तत्कालीन सातवाहनकालीन वेशभूषा, केशभूषा व आभूषणे यांचा अभ्यास करण्यास निश्चित महत्वपूर्ण ठरतील यात मला शंका वाटत नाही. 

चित्रात डाव्या बाजूच्या स्त्रिशिल्पाच्या डोक्यावरील वेदिकापट्टीच्या खालील बाजूस ' नागस पांचनिकायस ' असा उल्लेख असलेला शिलालेख असून वरील शिलालेखातून असे दिसून येते की; तत्कालीन नाग हे पाच निकायांचे जाणकार होते. पंच निकाय म्हणजे सुत्तपिटक ज्यात तथागत सम्यक संबुद्धांची वाणी सामावली आहे. अशा दिघनिकाय, मज्झिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय व खुद्दक निकाय मुखोद्गत असलेले म्हणजेच संपूर्ण बुद्धांची वाणी ज्यांना अवगत आहे असे ते नागांनी या स्तुपाच्या बांधणीस दान अथवा त्यास संरक्षण दिले होते हे सूचित होते. तसेच स्तंभाच्यावरील बाजूस डाव्या बाजूला पिंपळपानी चैत्यागवाक्षामध्ये धम्मचक्र असून ते जीवनचक्र दर्शवते. मध्यभागी स्तूप असून त्यावर हर्मिका पेटीच्यावर त्रिरत्न (बुध्द, धम्म, संघ) चिन्ह छत्रावली ने संरक्षित असून या त्रिरत्नांना पुष्पमाला अर्पण केल्या आहेत. तसेच उजव्या बाजूला तथागत सम्यक संबुद्धाना ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्षांचे अंकन केले असून त्यावर छत्रावली दर्शविण्यात आली आहे. त्या बोधी वृक्षाच्या शेजारी उपासक हात जोडून त्यास मनोभावे वंदन करताना दिसून येतात. स्तंभावर उत्किर्ण धम्मचक्र, स्तूप, बोधिवृक्ष हे थेरवाद परंपरेत प्रत्यक्ष बुद्धांचे प्रतिकात्मक स्वरूप आहे. पवनीचा महास्तूप आता केवळ भारताच्या विविध संग्रहालयात अवशेष रूपाने जिवंत आहे असे मी वर सांगिल्याप्रमाणे सदरील स्तंभशिल्प मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात सर्व अभ्यासक, पर्यटक यांना पाहण्यासाठी प्रदर्शनार्थ उपलब्ध आहे. 

संदर्भ :- पवनी उत्खनन

लेखन :- रोहित राजेंद्र भोसले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...