पवनीच्या महास्तूपाचे अवशेष मुंबईकरांच्या भेटीला...

पवनी (अक्षांश २०° ४६' ४८" उत्तर, रेखांश ७९° ३७' ४८") हे शहर आजच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असून नागपूरपासून ८२ किमी अंतरावर आग्नेयेस तर वैनगंगा नदीपासून ३ किमी अंतरावर नैऋत्य दिशेस स्थित आहे. पवनी हे प्राचीन काळापासून इथल्या तलम रेशीम कापडासाठी प्रसिद्ध असलेले शहर १९६८ मध्ये  अचानक एका वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले त्याला कारण म्हणजे एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमी ठरली. त्या बातमीचा मथळा असा की; जगन्नाथ टेकडीजवळ काही शिल्पे व ब्राम्ही लिपी उत्किर्ण असलेले स्तंभसदृष दगड सापडले आहेत. त्यानंतर; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ व नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे भेट देण्यात आली व त्यांना इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध शिल्पे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याअगोदर हेन्री कझिंस यांनी प्राचीन पुरावशेषांची यादी १८९७ मध्येच पवनी हे महत्त्वाचे प्राचीन पुरावशेष शहर म्हणून सांगितलेले होते. १९६८ च्या भेटीनंतर येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करणे आवश्यक आहे यावर विचार सुरू झाला.

जागेचा विस्तार व तेथे उपलब्ध शिल्पकला यांचा विस्तार पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ,नागपूर यांचे उत्खनन विभाग व नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाचे तत्कालीन प्रमुख श्री. शं. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन सुरू करण्यात आले. फेब्रुवारी १९६९ ते एप्रिल १९७० अशा कालावधीत दोन सत्रांत घडवून आणल्या गेलेल्या अनुक्रमे  जगन्नाथ टेकडी, चंडकापुरा टेकडी व हर्डोलाला टेकडी उत्खननाने करण्यात आले. पुरातत्त्वीय अवशेष आजूबाजूच्या ५ चौरस किमी एवढ्या मोठ्या प्रदेशात विखुरली गेली होती. उत्खननामध्ये स्तूपाच्या स्थापत्याचा कालावधी नुसार टप्पे समोर येत गेले ते पुढीलप्रमाणे :-

टप्पा १ :- (vii) यामध्ये मर्यादित प्रमाणात दुरुस्ती व नूतनीकरण झालेला स्तूपाचा भाग समाविष्ट आहे. जो की या स्तुपाचा सर्वात बाहेरचा भाग आहे. तद्नंतर

टप्पा २ :- (vi) यामध्ये दगडी स्लॅबसह प्रदक्षिणा पथ, बाह्य रेलिंग (वेदिकापट्टी) , प्रवेशद्वार आणि खांब असून

(v) दगडी स्तंभ रेलिंग (वेदिकापट्टी) आतील बाजूची,

(iv) लाकडी वेदिकापट्टी सह आजच्या इंजिनियर यांच्या भाषेत पाच कोर्स विटांचे वर्तुळाकार अवशेष

(iii) चुन्याचा प्रदक्षिणा पथ लाकडी वेदिकापट्टी सह

(ii) स्तूपाचे पहिले आवरण

(I) मूळ स्तूप.

तिथे मोठ्या प्रमाणावर उत्खननातून प्राचीन स्तूपाचे पुरावशेष प्राप्त झाले असून यामध्ये; स्तुपाचे वेगवेगळ्या संरचनात्मक टप्प्यांबरोबरच शिल्पे, शिलालेख, नाणी तसेच मातीची भांडी सापडली आहेत. या उत्खननाद्वारे असे सिद्ध झाले की; पवनीमध्ये एकेकाळी भारतातील सर्वात मोठा स्तूप अस्तित्वात होता. जो आजच्या जगप्रसिद्ध सांची स्तूपापेक्षा कैकपटीने मोठा होता. इथे मोठ्या प्रमाणावर थेरवादी बौद्ध वसाहत  होती. जगन्नाथ टेकडी येथील उत्खननात मिळालेल्या स्तूपाच्या उपलब्ध अवशेषांच्या अभ्यासावरुन  स्तूपाचे स्तर अथवा बांधकाम अथवा विस्तारीकरण तीन वेगवेगळ्या कालखंडातील असून ते  खालीलप्रमाणे सांगता येतात.

(i) मौर्यकालिन,
(ii) शुंग (सुंग) कालीन,
व (iii) सातवाहन व क्षत्रप

पवनीचा महास्तूप आता केवळ भारताच्या विविध संग्रहालयात अवशेष रूपाने जिवंत असून तो त्याच्या मूळ ठिकाणाहून नष्ट झालेला आहे. सदर चित्रात माझ्या शेजारी दिसत असलेले हे स्तंभशिल्प याच पवनीच्या महास्तूपाच्या वेदिकापट्टीचे वर्तुळाकार रेलिंग स्तंभ आहे. लाल वालुकाश्म खडकाचे हे स्तंभ ई.स. पूर्व पहिल्या शतकातील असून ते सातवाहन कालखंडात या स्तूपाला दान दिल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे. या उपलब्ध स्तंभावर खालील बाजूस असलेल्या स्त्री पुरुष शिल्पे ही तत्कालीन सातवाहनकालीन वेशभूषा, केशभूषा व आभूषणे यांचा अभ्यास करण्यास निश्चित महत्वपूर्ण ठरतील यात मला शंका वाटत नाही. 

चित्रात डाव्या बाजूच्या स्त्रिशिल्पाच्या डोक्यावरील वेदिकापट्टीच्या खालील बाजूस ' नागस पांचनिकायस ' असा उल्लेख असलेला शिलालेख असून वरील शिलालेखातून असे दिसून येते की; तत्कालीन नाग हे पाच निकायांचे जाणकार होते. पंच निकाय म्हणजे सुत्तपिटक ज्यात तथागत सम्यक संबुद्धांची वाणी सामावली आहे. अशा दिघनिकाय, मज्झिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय व खुद्दक निकाय मुखोद्गत असलेले म्हणजेच संपूर्ण बुद्धांची वाणी ज्यांना अवगत आहे असे ते नागांनी या स्तुपाच्या बांधणीस दान अथवा त्यास संरक्षण दिले होते हे सूचित होते. तसेच स्तंभाच्यावरील बाजूस डाव्या बाजूला पिंपळपानी चैत्यागवाक्षामध्ये धम्मचक्र असून ते जीवनचक्र दर्शवते. मध्यभागी स्तूप असून त्यावर हर्मिका पेटीच्यावर त्रिरत्न (बुध्द, धम्म, संघ) चिन्ह छत्रावली ने संरक्षित असून या त्रिरत्नांना पुष्पमाला अर्पण केल्या आहेत. तसेच उजव्या बाजूला तथागत सम्यक संबुद्धाना ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्षांचे अंकन केले असून त्यावर छत्रावली दर्शविण्यात आली आहे. त्या बोधी वृक्षाच्या शेजारी उपासक हात जोडून त्यास मनोभावे वंदन करताना दिसून येतात. स्तंभावर उत्किर्ण धम्मचक्र, स्तूप, बोधिवृक्ष हे थेरवाद परंपरेत प्रत्यक्ष बुद्धांचे प्रतिकात्मक स्वरूप आहे. पवनीचा महास्तूप आता केवळ भारताच्या विविध संग्रहालयात अवशेष रूपाने जिवंत आहे असे मी वर सांगिल्याप्रमाणे सदरील स्तंभशिल्प मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात सर्व अभ्यासक, पर्यटक यांना पाहण्यासाठी प्रदर्शनार्थ उपलब्ध आहे. 

संदर्भ :- पवनी उत्खनन

लेखन :- रोहित राजेंद्र भोसले.

Comments