अपरान्त म्हणजे पश्चिमेचा अंत… अर्थात जिथे पश्चिम दिशेचा अंत होतो असा प्रदेश अथवा देश म्हणून प्राचीनकाळी या कोंकण प्रदेशास अपरान्त म्हणून ओळखले जात होते. प्राचीन साहित्यात या अपरान्त देशाच्या व्याप्तीविषयी एकवाक्यता नसल्याने याचे निश्चित स्थान ठरवणे कठीण आहे. तरीदेखील तापी नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील आणि चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीनकाळी अपरान्त असे म्हटले जात असावे. तसेच; काही अभ्यासकांच्या मते अपरान्त म्हणजे मुंबईपासून ठाणे, नाशिक, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान आणि सिंध असा विस्तृत प्रदेश असावा. सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकाळात भरवलेल्या तिसऱ्या धम्मसंगितीची एक क्रांतिकारक निर्णय घेतला. आपल्या राज्यातील प्रजा नीतीने वागते आहे की नाही, हे पाहण्यासाठी व धम्माचे योग्य पालन करण्यासाठी मार्गदर्शनार्थ वेगवेगळ्या प्रदेशात धम्ममहामात्रांची नियुक्ती केली होती. त्यापैकी; अपरान्तात योनधम्मरक्खित नामक स्थविरास पाठवले असा उल्लेख प्राचीन बौद्ध साहित्य महावंसमध्ये सापडतो. हा अपरान्त प्रदेश पश्चिम महाराष्ट्रापासून वेगळा होण्याचे कारण म्हणजे उत्तर – दक्षिण अशी पसरलेली सह्याद्रीची डोंगररांग. या सह्याद्रीच्या कुशीमध्ये मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे प्राचीन लेण्या कोरल्या आहेत. ह्या लेण्या म्हणजे सह्याद्रीच्या अंगावरील दागिनाचं जणू. यांतील उन्नत शैलशिल्प पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. धम्माला कलेची साथ मिळाली आणि त्यातून महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या इतिहासाचे एक अजरामर ठरेल असे प्रकरण म्हणजे या लेण्या असे मनोमन म्हणावे वाटते. कधीकाळी येथून बुद्धांचा संदेश सर्वदूर पसरवणाऱ्या ह्या लेण्या नंतर शिक्षण तथा धम्म प्रचाराचे एक महत्वाचे केंद्र म्हणून उदयास आल्या. अपरांतातील अशाच काही महत्त्वाच्या बौद्ध वारसा स्थान व लेण्यांविषयीची माहिती करून देणे हा या लेखामागील हेतू आहे.
सोपारा - अपरान्ताची राजधानी
प्राचीनकाळी सोपारा ही अपरान्ताची राजधानी होती त्यामुळे राजधानीचा उल्लेख वगळून अपरान्ताचा इतिहास सांगता येणे शक्य नाही, नव्हे ते प्रथमतः मांडणे क्रमप्राप्त आहे. दिव्यावदानं ग्रंथातील पूर्णावदानं यात उल्लेखिल्याप्रमाणे; सोपारा येथील चंदनाच्या लाकडाचा व्यापारी पूर्णा (प्राकृत – पुन्ना) नामक व्यक्ती श्रावस्ती येथे काही कामानिमित्त गेला असता तेथे सम्यक संबुद्धांच्यां उपदेशाने प्रेरित होऊन तो तथागतांना शरण जाऊन प्रवज्या घेतली. काही दिवस तथगतांच्या सहवासात राहून त्याने आपल्या मायदेशात जाऊन धम्माचा विचार पोहोचवण्यासाठी गौतम बुद्धांकडून परवानगी घेतली. यादरम्यान तथागत बुद्ध व भन्ते पूर्णा (धम्मप्रभास) यांच्यात झालेले संभाषण मजेशीर असून विस्तारभयास्तव इथे मांडत नाही. परवानगी मिळविल्यानंतर; मायदेशी आल्यावर त्यांनी चंदनमाला प्रासाद गंधकुटीची निर्मिती केली. असे सांगितले जाते की; पूण्णा यांच्या विनंतीवरून भगवान बुद्ध सोपारा येथे आले होते. त्यांनी येथील कृष्णा व गौतम नामक नागराजांना धम्मदीक्षा दिली. यावरून असे लक्षात येते की; गौतम बुध्दांच्या हयातीत महाराष्ट्रात बुध्द धम्माचा प्रचार झाला होता. सम्राट अशोक यांचा पुत्र महेंद्र व मुलगी संघमित्रा सोपारा येथून तम्बापन्नी अर्थात सिरीलंकेस धम्मप्रचारासाठी गेले होते. यासंबंधीचे, उल्लेख प्राचीन बौध्द साहित्यात मिळतात. सातवाहनकाळात सोपारा हे आतंरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे समुद्री बंदर होते. येथून पश्चिमात्य देशांशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होते. आजच्या सोपारा गावाच्या पश्चिमेस अर्धा किमी अंतरावर बुरुड राजाचा कोट म्हणून एक टेकडी अस्तित्वात होती . या टेकडीचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते यांच्यामार्फत ई.स.१८८२ मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी केले. या उत्खननाधारे; येथे प्राचीन स्तुपाचे अवशेष आढळून आले. स्तूपाच्या मध्यावर उत्खननादरम्यान दगडी पेटी प्राप्त झाली. त्यात आठव्या तसेच नवव्या शतकातील कांस्य धातूच्या सप्तबुद्ध व एक मैत्रेय बोधिसत्व मूर्ती होत्या. त्याचबरोबर, तांबे, चांदी, स्फटिक तसेच सोन्याचा करंडक प्राप्त झाले. यात काही सुवर्णफुले तसेच सोन्याच्या करांडकात काही भिक्षापात्राचे अवशेष प्राप्त झाले. आतापर्यंत प्राप्त झालेले स्तूपातील अवशेष हे बुद्धांचे असल्याने सोपारा स्तुपात सापडलेले भिक्षापात्राचे अवशेषसुद्धा बुद्धांचेच आहेत. यावर, अभ्यासकांचे एकमत झाले. सोपारा स्तूपाचे वेगवेगळया काळात विस्तारीकरण झाले आहे. स्तुपाच्या उत्खनना दरम्यान; यजनसिरी (यज्ञश्री) सातकर्णी या सातवाहन राजाचे नाणेसुद्धा सापडले आहे. सोपारा स्तूपातून मिळालेल्या महत्वपूर्ण वस्तुंपैकी दगडी पेटी ही एशियाटीक सोसायटीच्या आत प्रवेश केल्यावर सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तर इतर वस्तू संस्थेकडे सुरक्षित आहेत.सोपारा ही अपरान्ताची राजधानी बरोबरच मौर्यांची प्रांतिक राजधानीसुद्धा होती. यास पुरावा म्हणजे सम्राट अशोकांच्या नितीलेखांपैकी क्रमांक ८ आणि ९ वा लेख १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सोपारा येथून जवळच भुईगाव येथे सापडल्या आहेत.
अपरान्ताचे लेणे अर्थात् कान्हेरी बौद्ध लेणीसमूह
मुंबई उपनगरातील बोरीवली मध्ये असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून सुमारे २००० ते २२०० वर्षापूर्वीचा बौद्धवारसा कान्हेरी लेणीसमूह लपला आहे. हा लेणीसमूह इतिहास अभ्यासकांसाठी माहितीपूर्ण भांडार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी सुमारे ११० च्या आसपास लेणी असलेला हा समूह प्राचीन काळातील पश्चिम भारतातील शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते हे लक्षात येते. कान्हेरी लेणी हे नाव जरी आताचे असले तरीही त्या लेण्या ज्या डोंगरावर आहेत त्यास ‘कन्हसेल’ व लेणीचे ‘कन्ह महाराजा महाविहार’ असे नाव इथल्या शिलालेखात वाचायला मिळतात. इसवी सनाच्या सातव्या शतकात आलेल्या विद्वान चिनी भिक्खू ह्यू एन त्संग यांच्या प्रवासवर्णनात कान्हेरी येथील गुरू परंपरेबद्दल माहिती मिळते. यावरून; या अशा अपरान्त देशाच्या महत्वपूर्ण लेणीची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:-
लेणी क्रमांक १ हे या लेणीसमुहातील अपूर्ण स्वरूपातील दुमजली चैत्यगृह असून जर हे पूर्णत्वास गेले असते तर अपरान्त देशाचे सर्वात मोठे चैत्यगृह म्हणून नावाजले गेले असते यात काही शंका नाही. लेणी क्रमांक २ हे चैत्यगृह व विहार स्वरूपातील असून, यात उजव्या बाजुला दोन पूर्ण व एक अपूर्ण स्तूप दिसून येतो.यातील एका स्तूपामागे अवलोकितेश्वर सह अष्टभयशिल्पाचे अंकन केलेले दिसून येते. तसेच शेजारी सप्तबुद्ध व मैत्रेय बोधिसत्वशिल्पसुद्धा पाहता येतात. तसेच डाव्या दिशेला विहार असून बाहेरच्या बाजुला बसण्यास दगडी बाक वे दान शिलालेख व बुद्धशिल्प दिसतात. या लेणीच्या बाहेरच्या बाजूस पाण्याची टाके एकाला एक लागून दिसतात. पावसाचे पाणी साठवण्याची कलात्मक रचना पाहून अचंबित व्हायला होते. येथील टाक्यांवर दानदात्यांचे दानशिलालेख आहेत. लेणी क्रमांक ३ मध्ये जाण्यापूर्वी या चैत्यगृहाच्या समोरील भागात सर जेम्स बर्ड यांच्यामते; तीन दगडी स्तूप होते. आता केवळ एक स्तूप अवशेषमात्र शिल्लक आहे.
लेणी क्रमांक ३ हे चैत्यगृह प्रकारातील लेणं ई.स. दुसऱ्या शतकात यजन सिरी (यज्ञश्री) सातकर्णी राजाच्या कारकिर्दीत बांधलेले सुमारे ३ मजली उंच असलेले आहे. है चैत्यगृह कार्ला लेणी नंतरचे क्रमांक दोनचे सर्वात मोठे चैत्यगृह असून काही पायऱ्या चढून या चैत्यगृहाच्या प्रांगणात प्रवेश होतो. तत्पूर्वी; बाहेरच्या पायऱ्यांच्या पूर्वी वेदिकापट्टीयुक्त कठडा त्यावर खालच्या बाजूस हत्ती, घोडे, बैल यांबरोबरच पाठीवर दोन खुर असलेले (बॅक्टेरियन) उंट दिसतात. कठड्यावर डाव्या बाजूला नागराजा तर पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला भग्नस्थितीतले द्वारपाल आहेत. चैत्यगृहाच्या प्रांगणात बाजूला सिंहस्तंभ व धम्मचक्र स्तंभ दिसून येतात. चैत्यगृहाच्या दिर्घिकेत डाव्या व उजव्या बाजूस अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्धशिल्पाच्या धर्तीवर बत्तीस सुलक्षणावर आधारित सुमारे २२ फूट उंचीचे पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन असे दोन भव्य बुद्धशिल्प आहेत. डाव्या बाजुच्या बुध्दशिल्पाच्या शेजारी अवलोकितेश्र्वर असून त्याशेजारी पश्चिमस्वामिनी दीपताराचे सुरेख शिष्य आपल्या हृदयाचा ठाव घेते. समोरील भिंतीवर दोन्ही बाजूस युगल शिल्प असून कदाचित ते लेणी गजसेन आणि गजमित्त असे बंधू असून त्यांचा दानाचा उल्लेख चैत्यगृहाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर केला आहे. चैत्यगृहात प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी वातायन कोरले आहे आहे. चैत्यगृहाच्या आतील बाजूसचा आकार गजपृष्ठाकार तसेच चापाकार असून मध्यभागी भव्य स्तूप आहे. स्तुपाला प्रदक्षिणा करण्यासाठीचा पथ आहे. छताला कधीकाळी लाकडी तुळया होत्या आता नष्ट झाल्या असून त्यांच्या खोबण्या शिल्लकमात्र आहेत. लेणी क्र. ४ है चैत्यगृह प्रकारातील लेणी असून वर्तुळाकार जागेत मध्यभागी स्तूपाची रचना दिसते. थेरवादकालीन स्तूपावर महायानकाळात बुद्धशिल्प कोरले आहेत. तसेच; सभोवतालच्या भिंतीवर देखील बुद्ध शिल्प पाहता येतात. लेणी क्रमांक ५ हे शतरेक अमात्याचे पिण्याच्या पाणीटाक्यांचे दान असून वरील बाजुस दान शिलालेखात वशिष्टीपुत्र सातकर्णी याची पत्नी व कार्दमक महाक्षत्रप रुद्र याची कन्या असा उल्लेख आलेला आहे. पावसाचे पाणी टाक्यात साठवण्यासाठीची दगडाला केलेला चर विशेष उल्लेखनीय आहे. लेणी क्रमांक ११ या लेणीच्या व्हरांडयाच्या डाव्या बाजूस, द्वितीय कपर्दिच्या शासनकाळात गौड अर्थात आजच्या बंगाल प्रांतातील व्यापारी बुद्धाचा परमशिष्य गोमी अविघ्नकार याने कन्ह महाराजा महाविहारात ध्यान कक्ष व भिक्खूंच्या चीवरासाठी अक्षयनिधी दिल्याचा महत्वाचा शिललिख आहे. वेरूळ लेणी क्रमांक ५ शी साधर्म्य साधणारे असून तत्कालिन ग्रंथालय/ग्रंथभांडार होते. लेणी क्रमांक ३१ ही कान्हेरीतील महत्वाची चैत्यगृह लेणी असून आतील भागात सुंदर असा स्तूप पाहता येतो. १९४० मध्ये या लेणीसमोरील ढिगाऱ्याखाली मो.ग.दीक्षित यांना वज्रयान पंथातील तारा या देवतेचे काष्ठशिल्प भेटले होते. ते शिल्प नालंदा विद्यापीठ अथवा बंगालमधून इथे आणले गेले असावे असा कयास आहे.
लेणी क्रमांक ३४ मधील आंतरमंडपात अक्षोभ्य बुद्धांचे कान्हेरीतील एकमेव चित्र पाहता येते. लेणी क्रमांक ४१ मध्ये अकरा डोकी व चार हात असलेली एकदशमुख अवलोकितेश्वर बोधीसत्वाची जगातील पहिली मूर्ती या कान्हेरी लेणीत पाहता येते. शेजारी खंडीत स्वरूपात वरद मुद्रेत बुध्दशिल्प दिसते. लेणी क्रमांक ६७ मध्ये दीपंकर जातक कथेवर आधारित शिल्पपट दिसून येतो. लेणी क्रमांक ८९ मध्ये महत्वाचे असे गन्डब प्रतिहार शिल्प असून सदर लेणीत धम्मचक्क प्रर्वतन मुद्रा तसेच प्रलंबपादासनात बसलेल्या तसेच उभ्या स्थानक बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक ९० ही या समुहातील अतिशय महत्वाची लेणी असून या लेणीत महायान परंपरेत महत्व प्राप्त झालेल्या अवलेकितेश्वर बोधिसत्व दहा प्रकारच्या भयापासून संरक्षण देतात या अर्थाचे महादसभय शिल्पपटाचे अंकन असून या शिल्पात बोधिसत्व अवलोकितेश्वर त्यांच्या शक्ती तारा व भृकुटीसह दिसून येतात. मानवी गरजांमध्ये पाण्याचे विशेष महत्व आहे. पावसाचे पाणी अडवून त्यावर बांध घालण्याची पद्धत प्राचीन असून त्याचे सुरेख उदाहरण कान्हेरी लेणीत पाहता येते. येथील डोंगरातून वाहणाऱ्या आजच्या दहिसर नदीवर दगडीबांध घालून पाणी अडवून ठेवण्याची युक्ती भिक्खुंनी किती नियोजनबद्ध केली आहे ते अवशेषरूपाने धरणाच्या भिंतीद्वारे पाहता येतात. हे धरण बांधण्यासाठी सोपाऱ्याच्या पूणक व्यापाराने जनकल्याणार्थ दान दिले आहे अशी शेजारील शिलालेखात नोंद आहे. तसेच कान्हेरी लेणी येथील लेणीचा आढावा घेत असता येथील लेण्यांच्या सानिध्यात असलेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील निर्वाणविठी भारतात अन्यत्र कुठेही नाही. लेणी क्रमांक ८७ येथे अरहंत भिक्खूंच्या स्मरणार्थ इथे मोठ्या प्रमाणात दगड विट मातींचे स्तूप होते जे काही अवशेषरूपाने शिल्लक आहेत ते पाहता येतात. येथे २७ शिलालेखसुद्धा सापडले असून विद्वान भिक्खूंची नावे तसेच त्यांची गुणविशेष कोरले आहेत. या शिलालेखांच्या शोधावरून कान्हेरी येथे उज्ज्वल गुरू परंपरा होती तसेच ते एकेकाळचे पश्चिम भारताचे मोठे शैक्षणिक केंद्र होते हे सिद्ध होते.
लेखन – रोहित राजेंद्र भोसले
टीप :- दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या निमित्ताने 'अपरान्त संगीती विशेषांक २०२४' या महत्त्वपूर्ण विशेषांकात माझा कोकणातील काही ठराविक लेण्यांचा माहितीपूर्ण आढावा घेतलेला सदरील लेख 'अपरान्ताचे लेणे…' या शीर्षकाखाली प्रकाशित झाला असून; तो माझ्या Blog वर दोन भागांमध्ये मी आपणास उपलब्ध करून दिलेला आहे. दोन्ही भाग वाचून लेखाच्या शेवटी आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
धन्यवाद 😊❤️🙏
नमो बुद्धाय जयभीम जय सम्राट अशोक
ReplyDeleteनमो बुद्धाय जय भीम 🙏 अशोक सम्राट महान यांचा विजय असो.
Delete