मुख्य सामग्रीवर वगळा

सोपारा येथील ऐतिहासिक स्तूप...!!!


सोपारा हे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात स्थित आहे. ज्यास आज नालासोपारा असेसुद्धा ओळखले जाते. नालासोपारा हे मुंबईच्या जवळ असलेले एक वेगाने विकसित होणारे उपनगर असले, तरी या सोपाऱ्याचा प्राचीन इतिहास अत्यंत समृद्ध आहे. आज आपण सोपारा आणि येथील प्राचीन स्तूपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी, आपण सोपाराच्या प्राचीन इतिहासावर एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकूया. ज्या काळात मुंबई हे लहान-लहान बेटांमध्ये विभागलेले होते, त्या काळात सोपारा हे एक अत्यंत समृद्ध शहर तथा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक महत्त्वाचे बंदरही होते. येथून अरब, ग्रीक, रोम, मेसोपोटेमिया आणि आफ्रिकन देशांशी व्यापार केला जात असे. इसवी सन १५० मध्ये, ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ टॉलेमी याने आपल्या 'जिओग्राफी' (Geography) या ग्रंथात सोपारा हे नवसारी आणि चौल यांच्या दरम्यान वसलेले असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पहिल्या शतकात रचलेल्या 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' (Periplus of the Erythraean Sea) या ग्रंथात सोपारा हे ठिकाण भृगुकच्छ (सध्याचे भरूच) आणि कल्याण यांच्या दरम्यान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, सोपाराचा प्राचीन उल्लेख अवदान ग्रंथांपैकी एक ' दिव्यावदान ' मध्येही आढळतो. या ग्रंथात दानाशी संबंधित ३८ कथांचा समावेश आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाची जी कथा आहे—ज्यामध्ये भंते पूर्ण (किंवा धम्मप्रभास) यांचे चित्रण आहे—ती कथा तुम्ही अजिंठा लेण्यांमधील लेणे क्रमांक १० च्या प्रवेशद्वाराजवळ पाहू शकता. प्राचीन सिलोन (सिरी लंका) येथे लिहिलेल्या 'महावंश' या ग्रंथात असा उल्लेख आढळतो की, विजय नावाचा एक राजा सोपारा (सोपारक) बंदरातून ताम्रपर्णी (सध्याचे श्रीलंका) देशाकडे रवाना झाला होता. विजय हा श्रीलंकेचा पहिला राजा म्हणून ओळखला जातो. सम्राट अशोकाच्या विशाल साम्राज्यातील एक प्रांत म्हणूनही सोपाऱ्याचे स्थान महत्त्वाचे होते. सम्राट अशोकाच्या एकूण १४ शिलालेखांपैकी, आठव्या आणि नवव्या क्रमांकाचे शिलालेख सोपारा येथेच आढळून आल्या आहेत. त्यापैकी; केवळ ९ व्या क्रमांकाचा शिलालेख सद्यस्थितीत उपलब्ध असून तो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे प्रदर्शनार्थ ठेवला आहे. त्या शिलालेखाची माहितीपर पोस्टची लिंक या पोस्टच्या खाली दिलेली असून ती माहिती देखील नक्की वाचा. हा स्तूप सध्या ' भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा ' च्या (Archaeological Survey of India) अखत्यारीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली या स्तूपाचे सुशोभीकरणाचे काम सध्या संथगतीने का होईना पण सुरू आहे. ६ मे १९५५ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्तूपाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनपर भाषण केले होते. सोपारा बौद्ध स्तूप हे मुंबईपासून जवळच असलेल्या या ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध प्रदेशातील २५०० वर्षे जुने वारसा स्थळ आहे.
क्रमशः
©✍️ रोहित रा. भोसले (अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीकृत अपरान्त संगिती विशेषांकासाठी मजतर्फे लिहिलेल्या 'अपरान्ताचे लेणे…' या लेखातील एक परिच्छेद)


#rohitrbhosale #soparastupa #soparaedict

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...